1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : कोपरखैरणे प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी कोपरखैरणे विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी तीव्र शब्दांत संवाद साधला. संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे आणि महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा, पावसाळापूर्व नाले-गटारांची साफसफाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोपरखैरणे प्रभागात पाणीपुरवठा विभागाकडून होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यापूर्वी नाले आणि गटारांची अपुरी साफसफाई तसेच रस्त्यांची दयनीय अवस्था यासह अनेक समस्यांवर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावेळी विभाग अधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा देत, दहा दिवसांत समस्यांचे निराकरण न झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची तसेच “तोंडाला काळ फासण्याची” चेतावणी दिली. या बैठकीत संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर, नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासन कितपत गंभीरपणे पावले उचलते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started