2–3 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका, जी आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते, यंदाच्या मुसळधार पावसात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामागील कारण म्हणजे महानगरपालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांवरील अविश्वास, कासवगतीची कार्यप्रणाली आणि प्रशासकीय अहंकार, असा आरोप नागरिक आणि स्थानिक नेत्यांकडून होत आहे.

महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर बराच काळ प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सूत्रांनुसार, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामागील प्रमुख कारण आहे. आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवत त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळी नियोजनात मोठ्या चुका झाल्या. नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि पाण्याचा निचरा यासारख्या मूलभूत कामांना प्राधान्य देण्यात आले नाही. यामुळे पावसाळ्यात शहरातील अनेक भागांत पाणी साचून राहिले आणि रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले.

नवी मुंबईतील पायाभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये महानगरपालिकेची कासवगती स्पष्ट दिसून येते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट राहिली. वाशी, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली यासारख्या भागांमध्ये नाल्यांमधील गाळ आणि कचरा काढण्यात आला नाही, ज्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. याशिवाय, पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक पंप आणि यंत्रणा अपुरी पडली. स्थानिक रहिवाशी सांगतात की, “प्रत्येक वर्षी तेच तेच नाटक. पावसाळ्यापूर्वी मोठमोठ्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.”

आयुक्तांच्या प्रशासकीय अहंकारामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वारंवार नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या मागण्या केल्या होत्या, परंतु त्यांना प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. जरा, आयुक्तांना सर्व काही स्वतःच ठरवायचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांना काहीच किंमत दिली जात नाहीए. यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील दरी वाढली आहे, ज्याचा फटका शहराच्या नियोजनाला बसला.

यंदाच्या मुसळधार पावसाने नवी मुंबईची अवस्था दयनीय झाली आहे. वाशी, सीबीडी आणि नेरूळमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे अपघात आणि नागरिकांचे हाल झाले. “आम्ही स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईसाठी कर भरतो, पण पावसाळ्यात आमचे शहर नदीसारखे दिसते,” अशी खंत सीबीडी मधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, रुग्णालये आणि शाळांनाही पाण्याचा फटका बसला, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

या सगळ्या परिस्थितीत आयुक्तांनी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही किंवा सार्वजनिक निवेदन जारी केलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष वाढत आहे. सामाजिक माध्यमांवरही आयुक्तांच्या कारभारावर टीका होत आहे. काही नागरिकांनी तर आयुक्तांच्या बदलीची मागणी केली आहे, तर काहींनी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेला आपली गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. नालेसफाई, पाण्याचा निचरा आणि रस्ते दुरुस्ती यासारख्या कामांना गती देणे आवश्यक आहे. याशिवाय, आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. अन्यथा, नवी मुंबईसारख्या नियोजित शहराची प्रतिमा आणखी खराब होण्याचा धोका आहे. नागरिकांना आता प्रशासनाकडून त्वरित कारवाई आणि पारदर्शकतेची अपेक्षा आहे. प्रश्न असा आहे की, आयुक्त आणि महानगरपालिका या संकटातून मार्ग काढू शकतील का, की नवी मुंबई पुन्हा पुढील पावसाळ्यातही ‘डुबत’ राहील?


Design a site like this with WordPress.com
Get started