प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच दोन मातब्बर स्थानिक आगरी समाजातून प्रमुख पक्षातून उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे, या विधनासभा निवडणुकीत स्थानिक आगरी – कोळी समाज आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी भाडोत्री मतदानांची विभागणी म्हात्रे व नाईकांमध्ये होणार आहे. तर, अस्थानिक (नॉन आगरी) उमेदवारही सर्वबाजूने तोडीस तोड असल्याने, 20 नोव्हेंबर जनता कोणाला निवडणार आणि 23 नोव्हेंबरला विजयाचा गुलाल कोण उधळणार याबाबत मोठ्याप्रमाणात कन्फ्युजन राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.
मतदार संघात आगरी – कोळी समाजापेक्षा गावातील अतिक्रमित इमारतींमध्ये मोठ्यासंख्येने राज्यातील आणि देशातील विविध भागांतील मतदार वास्तव्य करतात. ज्यांच्यावर, येथील स्थानिकांचा प्रभाव असतो. त्यामुळे मूळ गावठाणातून आगरी समाजाच्या उमेदवाराला कायम मतांची आघाडी मिळते.
परंतु, यावेळी दोन मातब्बर उमेदवार आगरी समाजातून असल्याने ग्रामस्थांची मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे, शहरी आणि झोपडपट्टी विभागातील मतदार ज्याच्या पारड्यात भरभरून मतदान करतील त्याचाच विजय नक्की होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

