1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : केंद्र सरकारच्या टेक्सटाईल समितीने नवी मुंबई महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार केला असून या माध्यमातून कपडयाच्या कचरा व्यवस्थापनामध्येही नवी मुंबई या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी एक यशस्वी पाऊल टाकत आहे.

नुकताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी ग्राहकांकडून वापरानंतरच्या कापडी कच-याचे व्यवस्थापन करुन या साखळीतील शाश्वतता व पुनर्चक्रीकरण प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारच्या टेक्सटाईल समितीसोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे. PILOT PROJECT ON SUSTAINABILITY AND CIRCULARITY IN TEXTILE CHAIN TVC BY MANAGING POST CONSUMER TEXTILE WASTE  या विषयीच्या कराराचा कोणताही आर्थिक भार नवी मुंबई महानगरपालिकेवर पडणार नाही. केंद्र सरकारसोबत अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.

नवी दिल्ली येथे भारत मंडपम सभागृहात झालेल्या या सामंजस्य करार स्वाक्षरीप्रसंगी केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या राज्यमंत्री दर्शना जरदोश, वस्त्र मंत्रालय सचिव रचना शाह, वस्त्र मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा, वस्त्र आयुक्त रुप राशी तसेच नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांचे प्रतिनिधी म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे व अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थि त होते. हा सामंजस्य करार केंद्रीय टेक्सटाईल समिती तसेच नवी मुंबई महानगरपालिका आणि एसबीआय फाऊंडेशन, आयडीएच इंडीया व टिजर आर्टिसन ट्रस्ट यांच्यामध्ये झालेला आहे.

भारतातील उदयोगांमध्ये कापड उदयोग हा बहुतांश लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणारा दुस-या क्रमांकाचा महत्वाचा उदयोग असून कापडाच्या वाढत्या मागणीमुळे वस्त्रोद्योगपूर्व आणि नंतर मोठया प्रमाणात  कचरा निर्माण होतो. कापडाच्या वापरानंतर साधारणत: 98% कचरा घनकचरा प्रकल्पस्थळी जातो. एकूण कार्बन उत्सर्जनातही वस्त्रोदयोगाचा 10% इतका मोठा वाटा असून एकूण कार्बन उत्सर्जनात हा पाचवा सर्वात मोठा वाटा आहे.

  वस्त्रोद्योग मूल्य साखळीतून सामाजिक आणि पर्यावरणीय ओझे कमी करण्यासाठी सामुहिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने टेक्सटाईल समितीसोबत सामंजस्य करार करुन नवी मुंबई महानगरपालिकेने एक पर्यावरणशील सकारात्मक पाऊल उचलले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वस्त्रोउदयोगांमध्ये तसेच कापड वापरानंतरच्या टेक्सटाईल कचरा व्यवस्थापनाबाबत पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी व त्याचा सुयोग्य आराखडा तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असून याची अंमलबजावणी भविष्यात देशाच्या इतर भागातही केली जाऊ शकते. यादृष्टीने हा प्रकल्प आणि त्याचा सामंजस्य करार महत्वाचा असून ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छतेमध्ये आणखी एक राष्ट्रीय बहुमानास्पद उपलब्धी आहे. 


Design a site like this with WordPress.com
Get started