प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सेक्टर 15, ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अल्पावधीतच देशातील अत्यंत आगळेवेगळे स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले आहे. 5 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन पूर्वसंध्येला ठाणे जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री व विदयमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील सुविधांचे लोकार्पण झाले असून यावर्षी स्मारकाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात 2 लाख 1 हजारहून अधिक नागरिकांनी रजिस्टरला नोंद करुन स्मारकास भेट दिली असून अभिनव स्मारक म्हणून प्रशंसा केलेली आहे.
समृध्द ग्रंथालय आणि सातत्यपूर्ण व्याख्यानांमुळे ‘ज्ञानस्मारक’ ही ओळख रूढ
स्मारकाला भेटी देणा-या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचार प्रणालीवर आधारित हे ‘ज्ञानस्मारक’ असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. त्यांच्याप्रमाणेच याठिकाणी भेटी देणा-या महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील विविध राज्यांच्या नागरिकांनी व परदेशी पर्यटकांनीही हे स्मारक म्हणजे बाबासाहेबांच्या सर्वस्पर्शी विचारांचे मूर्तीमंत रुप असल्याचे म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या चरित्रावर व विचारांवर आधारित पुस्तकांप्रमाणेच येथे आंबेडकरी विचारधारा तसेच महनीय व्यक्तीमत्वांवरील 5 हजारहून अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालय असून त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी आहे. हे ग्रंथालय हाच ख-या अर्थाने या स्मारकाचा आत्मा असून या माध्यमातून अभ्यासकांना व वाचकांना विचारांचा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देणारे हे स्मारक बाबासाहेबांचे पुतळाविरहीत ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे.
प्रेरणादायी इतर सुविधा दालनांचा नागरिकांवर प्रभाव
बाबासाहेबांचे जीवनचरित्र दूर्मीळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष दालन हे स्मारकाचे आणखी एक आकर्षण असून या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतोच तसेच त्यापासून प्रेरणाही मिळते अशी भावना तेथे भेट देणाऱ्या असंख्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
येथे असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोच्या माध्यमातून मिळणारी सुसंधी भारावून टाकते अशी भावना तेथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत.
एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या विविध सुविधा स्मारकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
ऐरोली मुलुंड पुलावरून नवी मुंबईत प्रवेश करताना लांबूनच नजरेस भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकाराचा करण्यात आलेला आहे.
अशा विविध प्रकारच्या आधुनिक सुविधांनी संपन्न असलेल्या या ज्ञानस्मारकामध्ये मागील 2 वर्षे सातत्याने विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेअंतर्गत आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून विचारांचा जागर करण्यात येत आहे. इतर शहरांमध्ये व्याख्यानमालांना उपस्थितीची कमतरता भासत असताना स्मारकातील व्याख्यानांना मात्र श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून त्याचीही विशेष नोंद विविध व्याख्यानमालांमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर व्याख्यात्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
ज्ञानस्मारकाची महती सर्वदूर पोहचविण्यात समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग
व्याख्यात्यांच्या तसेच स्मारकाला भेटी देणाऱ्या देशी-परदेशी नागरिकांच्या माध्यमातून स्मारकाची महती देशापरदेशात पोहचत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या drambedkarsmark या स्वतंत्र फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब अशा सोशल मिडीया पेजला देखील जगभरातून असंख्य नागरिकांचे लाईक्स आणि कमेंट्स प्राप्त होत आहेत.
नव्या पिढीतील मुलांवर ज्ञानसंपादनाचे संस्कार
या स्मारकाचे वेगळेपण त्याठिकाणी भेटी देणा-या नागरिकांना मनापासून जाणवत असून त्यांच्यामार्फत इतरांपर्यंत या स्मारकाची महती पोहचत आहे व त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी या ठिकाणी भेट दयावी असे त्यांच्यामार्फत आवर्जून सांगितले जात आहे. विशेषत्वाने नव्या पिढीमध्ये अर्थात मुलांमध्ये ज्ञान संपादनाचे विचार रुजावेत याकरिता पालक पुढाकार घेऊन आपल्या मुलांना या स्मारकाची भेट घडवित आहेत. अनेक जण मुंबई दर्शनाच्या सहलीसाठी येताना स्मारकाला आवर्जून भेट देत आहेत.
चैत्यभूमीवर विशेष स्टॉलव्दारे स्मारकाची माहिती प्रसारित करून स्मारकाला भेट देण्याचे आवाहन
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी देशापरदेशातून येणाऱ्या नागरिकांपर्यंत ऐरोली, नवी मुंबई येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील विविध सुविधांची महती विशेष स्टॉल लावून छायाचित्रांसह आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात येत आहे. चैत्यभूमीला भेट देणा-या नागरिकांनी सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या ज्ञानस्मारकाला भेट देऊन एक अलौकिक अनुभव व संस्मरणीय आठवण सोबत घेऊन जावी असे आवाहन स्टॉलवरून करण्यात येत आहे.
‘विचारवेध’ अंतर्गत 5 डिसेंबर सुप्रसिध्द व्याख्याते दिलीप मंडल सांगणार बाबासाहेबांची राष्ट्रनिर्माणातील महती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दि. 5 डिसेंबर रोजी, सायं. 6.30 वाजता ‘विचारवेध’ अंतर्गत सुप्रसिध्द लेखक, विचारवंत श्री. दिलीप मंडल यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑर राष्ट्रनिर्माण’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे तसेच बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानस्मारकाला महापरिनिर्वाणदिनानिमित्त भेट देऊन ‘ज्ञान हीच शक्ती’ हा विचार देणा-या बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

