2–3 minutes

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

पनवेल (पालिका प्रशासन) : राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप हे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करू नये, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी महविकास आघाडीला दिला. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्यावर कुणीही आघात केला तर याद राखा असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना आपल्या भाषणातून दिला.

राज्यात कंत्राटी भरतीचे महापाप काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांनी केले होते. हा लादलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस, ठाकरे गटाचा निषेध आज पनवेलमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर मार्गदर्शन करताना बोलत होते.

आ. प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, उद्धव ठाकरेंच्या रूपात अडीच वर्षे कंत्राटी पद्धतीने राज्याला मुख्यमंत्री मिळाला आणि ते पण फक्त फेसबुकवरच दिसायचे. लोकांना नाही भेटायचे पण शरद पवार यांना बरोबर भेटायचे. शिंदे सरकार कसे पाडले जाईल यासाठी महाविकास आघाडीचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मात्र आत्ताचे सरकार जनहितासाठी काम करणारे आणि भक्कम आहे, त्यामुळेच जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. शरद पवारांचा राजकीय खोटारडेपणा दिसून आल्याने त्यांच्या पासून त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते बाहेर पडले आहेत. राज्यातील नागरिक शरद पवारांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे बारामतीचा गड ही हलला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेच्या विचाराने सरकार चालविले. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सोबतीने लढवली पण सत्तेसाठी स्वार्थीपणा करत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना हाताशी घेतले आणि अखेर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी फक्त जनतेची दिशाभूल केली, असे सांगून लोकहिताचे निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.

कंत्राटी भरतीचा जीआर अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काढला. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी व्यक्त करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. लोकांची माथी भडकविण्याचे काम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे गटाचे नेते करत असून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्याचा काम करत आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या दिशाभूल राजकारणावर घणाघाती हल्ला चढवला.

पनवेल शहर व तालुका भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, समीर ठाकूर, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रसाद हनुमंते, नंदकुमार म्हात्रे, प्रितम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started