मुंबई (पालिका प्रशासन) : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम आहे. बचत गटांच्या उत्पादनांना मुंबई, ठाण्यासारख्या शहरात चांगली मागणी आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना ठाणे, नवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील बचत गटांना ठाणे व नवी मुंबईत जागा मिळणेबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते.
बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय म्हसाळ आदी उपस्थित होते.

