नवी मुंबई (पालिका प्रशासन) : स्वतःची पापे लपवण्यासाठी दुसऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी साडेतोड उत्तर दिले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासंबंधितचा राज्य शासनाचा कोणत्याही प्रकारचा शासकीय निर्णय उपलब्ध नसताना, येथील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून, या झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यात निव्वळ राजकीय धूळफेक होत असल्याची चर्चा सुरु असताना, भारतीय जनता पार्टीचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक व त्यांचे समर्थक “आमच्या व्यवसायात आणि झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामात अडथळा आणत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप, नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले, जिल्हासंपर्क प्रमुख किशोर पाटकर आणि माजी नगरसेवक अशोक गावडे यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
ज्यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होतो आहे. अशावेळी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकून विरोधकांना मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करणाऱ्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. तर, आरोप करणाऱ्यांची पार्श्वभूमी देखील तपासून पाहिली पाहिजे. तसेच हे तिघे म्हणजे नवी मुंबई नाही आणि सरकारही नाही. यांनी त्रास दिलेल्या घटकांची यादी देखील मोठी आहे. आम्ही राजकीय प्रगल्भतेने वागतो म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. आम्ही सहन करणार नाही. महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहील असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. नवी मुंबईचे हित कोणी जपले हे सर्वज्ञात आहे. आपली पापे लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही, असे सांगून बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप जर कुणी करीत असेल तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिला आहे.

