2–3 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : ‘थ्री आऱ’ च्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत ‘थ्री आर’ विषयावर जागतिक पातळीवरील वेबिनारचे आयोजन केले होते.

एका मोठ्या पातळीवर ‘थ्री आर’ विषयी खुली चर्चा व्हावी व यामधून ‘शून्य कचरा’ संकल्पनेला व्यापक स्वरुप लाभावे यादृष्टीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाश्वत भविष्याच्या दृष्टीने जबाबदारीने घनकचरा व्यवस्थापन (Driving a Sustainable Future with Responsible Waste Management)’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जगभरातील 600 हून अधिक संस्था प्रतिनिधींनी सहभागी होत ‘थ्री आर’ विषयक चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये नगरपालिकांचे मुख्याधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, रिसायकलर्स, व्हेंन्डर्स, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे संस्था प्रतिनिधी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत विस्तृत चर्चा केली.

नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदलत्या काळानुसार पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपल्या वर्तनात बदल घडविणे आवश्यक असल्याचे सांगत कचरा कमी करणे व करीत असलेल्या कच-याची निर्मितीच्या पातळीवरच विल्हेवाट लावणे या दोन्ही गोष्टीकडे जबाबदारीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. असा दृष्टीकोन नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून आजच्या वेबिनारमधूनही शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुयोग्य पर्याय पुढे येतील असा विश्वास व्यक्त केला.

आजच्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणा-या ई कच-याच्या विल्हेवाटीची फार मोठी समस्या उभी असून या वेबिनारमध्ये ई वेस्ट बाबत आणि बॅटरी वेस्टबाबत पॅनल डिस्कशन झाले. यामध्ये ई वेस्ट व बॅटरी वेस्ट संकलनाचे, विल्हेवाटीचे, पुनर्प्रक्रियेचे पर्याय यावर सविस्तर विचार विनिमय झाला. यामध्ये अमेरिकेतील  कॅलिफोर्निया ईआरआय चेआरमन जॉन शेगेरिऑन, इको रिसायकलींग लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बि. के. सोनी व रिटेक एन्व्हायरोटेक प्रा. लि. चे प्रादेशिक अधिकारी सिध्दार्थ शिवकुमार यांनी विविध मुद्दे मांडले.

एस प्लस पीएस आर्किेटेक्टचे संस्थापक पिंकीश शहा यांनी कच-यापासून तयार केलेल्या विटांच्या गृहनिर्मितीसाठी वापराच्या दीर्घकाळ टिकणा-या अनेक पर्यायांची माहिती दिली. पारसिक हिलवर अशाच प्रकारे नारायण भार्गव यांच्या बंगल्याचे बांधकाम रिसायकल साहित्यापासून केलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे टिकाऊ शौचालय निर्मितीसाठी कच-यापासून तयार झालेले बांधकाम साहित्य याबाबत इको इलेक्ट्रीकचे प्रमुख रिसायकलमॅन म्हणून ज्यांचा गौरव होतो अशा डॉ. बिनीश देसाई यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून या वेगळ्या विषयाची माहिती दिली.     

आपल्या दैनंदिन जीवनात विविध पद्धतींनी कचरा कमी करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे या बाबींमध्ये कच-याच्या पुनर्वापराव्दारे टिकाऊपणाचा समावेश करून प्रत्येकाने स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे हा संदेश या वेबिनारच्या माध्यमातून दिला गेला आहे. या अत्यंत सविस्तर संवादामुळे ‘थ्री आर’ विषयक नवनव्या संकल्पना पुढे आल्या व हेच या वेबसंवादाचे यश असल्याचे मत व्यक्त करीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वेबिनारमध्ये देशापरदेशातून सहभागी झालेल्या 600 हून अधिक स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जागरूक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्तींचे आभार मानले.


Design a site like this with WordPress.com
Get started